आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

डॉ सुरेश पाटील यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई - भांडुप येथील शिक्षक , पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना मुंबई मराठी पत्रकार भवन येथे १३ डिसेंबर रोजी, स्वतंत्र कोकणराज्य अभियान संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात"कोकणरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री संजय कोकरे, जेष्ठ पत्रकार आणि संपादक श्री सचिन कळझुनकर आणि मुंबई अध्यक्ष श्री धनंजय कु्वेसकर उपस्थित होते.
    सदर कार्यक्रमात कोकणातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना जगमान्य ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी कडून मानद डॉक्टरेट प्राप्त झाली आहे तसेच महाराष्ट्र शासना तर्फे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आहेत. कोकण रेल्वे प्रवासी संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत तसेच वैभववाडी तालुका विकास संस्था संघटनेचे ते संस्थापक - अध्यक्ष आहेत, भारतीय ह्युमनराईट संघटनेचे मुंबई उपाध्यक्ष आहेत तसेच साई एज्युकेअर ट्रेनिंग स्कूल या संस्थेचे संचालक आहेत. डॉ सुरेश पाटील यांचे "माय इंग्लिश ग्रामर बुक" नावाचे पुस्तक तसेच "फक्त तुझ्यासाठी" नावाचा चारोळी संग्रह प्रकाशित झालेले आहेत. डॉ सुरेश पाटील यांच्या "कोकणरत्न" निवडीणे समाजातील सर्वच स्तरांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

अनेक तक्रारी करून अखेर ठाणे येथील स्पिड ब्रेकरची दुरूस्ती!

मुंबई (सतिश पाटील):गेल्या अनेक दिवसापासून ठाणे तिनहात नाका ते कशिश पार्क मुंबई मुलुंड पच्छिम चेक नाका कडे जाणारा हायवे व आग्रारोड जोड रस्त्यावर असलेले पेवर ब्लॉकचे स्पिड ब्रेकर खूप खराब व चुकीचे होते.तसेच ते अपघाताला निमंत्रण देणारे व वाहनासही धोकादायक स्थितीत होते. नेहमीच विनाकारण वाहतुक खोळंबा व पाणी साचत होते तसेच प्रदृषण होत असे.कारण स्पिड ब्रेकर वर खाली व खड्डेमय झालेले होते. साहजिकच वाहने दिम्यागतीने जात असत.या समस्ये बद्दल सामाजिक कार्यकर्ते व  पत्रकार सतिश पाटील यांनी हा मुद्दा मार्गी लावून धरला होता. अखेर ठाणे महानगर पालिकेने उशीरा का होईना दखल घेऊन आता जुने धोकादायक स्पिडब्रेकर काढून त्या ठिकाणी नवीन डांबरी स्पिडब्रेकर बसवून वाहन चालकांना व जनतेला जनतेला दिलासा दिला आहे.

कोल्हापूर येथे ग्रामीण डाक सेवक संमेलन संपन्न ; केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी ग्रामीण डाक सेवकांना (GDS)केले संबोधित!!

प्रतिनिधी: केंद्रीय दळणवळण मंत्री तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री  ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी 13 डिसेंबर 2025 रोजी कोल्हापूर येथे आयोजित ग्रामीण डाक सेवक संमेलनात गोवा व पुणे प्रदेशातील सुमारे 6000 ग्रामीण डाक सेवकांना (GDS) संबोधित केले.
     आपल्या प्रभावी आणि ओघवत्या मराठी भाषणात माननीय मंत्र्यांनी टपाल कर्मचाऱ्यांच्या अखंड सेवाभावाचे कौतुक केले. पोस्टमन हे “केवळ पत्रंच नव्हे तर बँकिंग, विमा आणि शासकीय सेवा देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणारे विश्वासाचे सेतू आहेत,” असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भारताला जोडण्यात आणि देशाच्या विकासाला चालना देण्यात टपाल कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
      टपाल कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी सुधारणांचा आढावा घेताना  सिंधिया यांनी ग्रामीण डाक सेवकांच्या मुलांना केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेश, भत्त्यांमध्ये वाढ, नवीन गणवेश व जॅकेटची रचना, तसेच ‘प्रोजेक्ट ॲरो’ यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. गावागावांत कार्यरत कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांना सक्षम करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेतूनच या सर्व सुधारणा झाल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
        देशभरात 1.65 लाख टपाल कार्यालये आणि 6.5 लाख गावांपर्यंत पोहोच असलेल्या भारतीय डाक विभागाच्या अद्वितीय सक्षमतेचा उल्लेख करत, विभागाला आधुनिक लॉजिस्टिक्स आणि सेवा केंद्र म्हणून रूपांतरित करण्याचे आवाहन त्यांनी केले. नावीन्य, विश्वासार्हता आणि मूल्याधिष्ठित दृष्टिकोन यांवर भर देत, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या “डाकिया अब बँक लाया”या दूरदृष्टीची आठवण करून देताना, त्यांनी स्पष्ट केले की भारतीय डाक विभागाने केवळ टपाल वितरणाच्या पलीकडे जाऊन आर्थिक समावेशन आणि नागरिक सेवा पुरविणारा एक विश्वासार्ह माध्यम म्हणून स्वतःचा विकास केला आहे. त्याचबरोबर, भारतीय डाक विभागाने “सेवा भाव”— जनतेच्या सेवेसाठीची बांधिलकी — ही आपली मूलभूत मूल्ये सातत्याने जपली आहेत.
      संमेलनाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 10 ग्रामीण डाक सेवकांचा सत्कार. प्रत्येक पुरस्कारार्थींशी वैयक्तिक संवाद साधत माननीय मंत्र्यांनी स्वतःच्या हातांनी प्रत्येकाला नवीन इंडिया पोस्ट जॅकेट व कॅप घातली आणि पोस्टमन बॅग परिधान करून दिली. टपाल सेवेतील सन्मान, ओळख आणि अभिमानाचे प्रतीक ठरलेल्या या कृतीला उपस्थितांकडून जोरदार टाळ्या आणि मनापासून दाद मिळाली.
       या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर श्री छत्रपती शाहू महाराज, माननीय खासदार, कोल्हापूर;  धनंजय महाडिक, माननीय खासदार, कोल्हापूर;  जितेंद्र गुप्ता, महासंचालक, टपाल सेवा;  सुवेंदू कुमार स्वैन, सदस्य (कार्मिक), टपाल सेवा मंडळ; तसेच  अमिताभ सिंह, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल उपस्थित होते.
      कार्यक्रमादरम्यान इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या एआय-आधारित “भाषिणी” प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला. या उपक्रमातून भाषिक आणि सांस्कृतिक दरी मिटवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याची सरकारची दृष्टी अधोरेखित झाली, ज्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि बहुभाषिक डिजिटल इंडिया साकारण्याकडे वाटचाल होत असल्याचे सिद्ध झाले.
      समारोपाच्या भाषणात  सिंधिया यांनी सर्व टपाल कर्मचाऱ्यांना अभिमान, समर्पण आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोनातून सेवा देत राहण्याचे आवाहन केले आणि परिवर्तन व राष्ट्रीय सेवेची भावना पुढे नेण्यास प्रोत्साहित केले. आभार व्यक्त करत त्यांनी आपले भाषण “धन्यवाद, जय हिंद” या शब्दांत समाप्त केले.

खिडकाळी गावात प्रो.राजन पाटील यांच्या 'TALENT CLASS' अंतर्गत 'FUN FAIR' च्या रूपाने साकारला खाद्य पदार्थांचा छोटासा खाद्य मेळावा !!

कल्याण (प्रतिनिधी):  रविवार दि.१४ डिसेंबर २०२५ रोजी खिडकाळीमध्ये गांवदेवी मंदिराजवळील 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या संकल्पनेतून इयत्ता ५ वी.ते १२ वी.च्या विद्यार्थ्यांनी एक 'FUN FAIR' साकारले होते. सदर कार्यक्रम म्हणजे एक उत्सवच.! यात खाद्यपदार्थ व गेम असे एकुण २१ स्टॉल मांडले होते. साधारणतः५० -६० विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. 'FUN FAIR' उत्सवात विद्यार्थ्यांनी पाणी पूरी, शेव पूरी, सोया चिल्ली, पास्ता, पानी बोटल, कोल्ड्रींग, पेस्ट्रीक, पेरी-पेरी चिप्स, नुडल्स, मंच्युरियन भेळ, मोमोज, उकडीचे मोदक, फ्रेंड फ्राईज, स्माइलीज, कोल्ड कॉफी, चॉकलेट मिल्क सेक, मोजीटो, पाव भाजी, पनीर पकोडे, कप केक, ब्रेड रोळ, चना भेल, पॕटीस इ. खाद्यपदार्थ व खेळांचेही स्टाॕल मांडले होते. हे बनवण्यात विद्यार्थ्यांचाच सहभाग होता.
     'TALENT CLASS' खऱ्याअर्थाने विद्यार्थ्यांसाठी 'लकी-स्पोट' आहे. कारण तेथे विद्यार्थ्यांची जडण-घडण होते. SSC च्या विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी करवून घेतली जाते. परिणामी १००% निकाल लागलो. ९-१० वर्षापासून खिडकाळी गावात 'TALENT CLASS' मधील विद्यार्थ्यांच्या बुध्दित शिक्षणासोबत व्यावसायिक ज्ञानाची भर पडावी म्हणून प्रो.राजन पाटील यांनी केलेला 'FUN FAIR' हा अनोखा प्रयोगच म्हणावा लागेल. या 'FUN FAIR' उत्सवाचा आनंद घेण्यासाठी खिडकाळी गावातील ग्रामस्थांनीही भेटी दिल्या. तसेच खिडकाळी गावातील 'सांस्कृतिक कार्यक्रम' व 'सामाजिक बांधिलकी' जपणाऱ्या 'ईको-फ्रेंडली गृप' मधील कवी-श्री.नवनाथ ठाकुर, श्री.रूपेश पाटील, श्री.अनिल म्हात्रे, श्री.धनेश ठाकुर, श्री.दिगंबर पाटील यांनीही सदर उत्सवास सदिच्छा भेट दिली व सर्व स्टाॕलवर जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांचे मनभरून कौतुक केले तसेच विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद ही घेतला व 'TALENT CLASS' चे प्रो. राजन पाटील व प्रा.किर्ती पाटील यांस शुभेच्छा देऊन दोघांचे अभिनंदन केले.
        'FUN FAIR' हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक आवड निर्माण व्हावी आणि भविष्यात आर्थिक नियोजन करावे तसेच स्वावलंबी जीवनाचे प्रशिक्षण मिळावे.हा मुख्य हेतू प्रो.राजन पाटील यांनी केलेला क्रांतिकारी प्रयत्न आहे.असे कवी नवनाथ ठाकुर यांनी आपले मत मांडले व प्रो.राजन पाटील आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

कोकणचे सुपुत्र मोहन कदम,श्रीराम वैद्य,दीपक फणसळकर,शांताराम गुडेकर, केतन भोज "कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित

मुंबई(सौ. मनस्वी मनवे) सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नागरिक पत्रकार, गुणवंत कामगार पुरस्कार विजेते श्री. श्रीराम विष्णू वैद्य,पत्रकार/सामाजिक कार्यकर्ते मोहन कदम, शांताराम गुडेकर, केतन भोज, दीपक फणसळकर यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे पत्रकारिता /सामाजिक कार्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल "कोकणरत्न पदवी-२०२५ पुरस्काराने गौरविण्यात आले.हा पुरस्कार प्रदान सोहळा १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजता मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकणातील निवडक व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या "कोकणरत्न" या मानाच्या पदवीसाठी यंदा उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या विविध मान्यवरांचा गौरव करणारा हा अतिशय स्तुत्य
उपक्रम असून यंदाच्या सोहळ्याला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले आहे. स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचा हा उपक्रम कोकणातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. श्री संजय कोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा दिमाखात संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार सचिन कळझुनकर व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबई अध्यक्ष श्री धनंजय कुवेसकर, खजिनदार श्री राजेंद्र सुर्वे, नेते श्री सुभाष राणे आणि सल्लागार श्री दिलीप लाड या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
           गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न धडाडीने मांडणारे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहर पासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसर मधील आंगवली (रेवाळे वाडी) चे सुपुत्र श्री. शांताराम ल. गुडेकर तसेच मु. पो. कासार कोळवण गावातील समाज सेवक, पत्रकार, अष्टपैलू व्यक्तीमत्व श्री. मोहन जयराम कदम, लांजा तालुका सुपुत्र केतन भोज,दीपक फणसळकर आणि रायगड चे सुपुत्र श्रीराम वैद्य यांना प्रतिष्ठेच्या 'कोंकणरत्न पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पत्रकार श्रीराम वैद्य, मोहन कदम, शांताराम गुडेकर, केतन भोज, दीपक फणसळकर यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्कारांची मालिका अखंडपणे सुरूच आहे.त्यांच्या या चतुरस्र कामगिरीबद्दल स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे "कोंकणरत्न पदवी" पुरस्कार
देऊन सन्मानित करण्यात आले.यांनी ग्रामीण भागातील अनेक मूलभूत प्रश्न, स्थानिक स्तरावरील प्रशासकीय कामकाजातील त्रुटी अत्यंत परखडपणे आणि निःपक्षपातीपणे समाजासमोर आणल्या. त्यांचे तळागाळातील सामान्य नागरिकांच्या समस्यांना प्रभावीपणे वाचा फोडल्याने प्रशासनाला अनेक वेळा या प्रश्नांची गंभीर दखल घेण्यास भाग पाडले आहे. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयी उपक्रम राबवित असतात.रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह त्यांचे कार्य हीच त्यांची एक ओळख निर्माण झाली.कोणतीही अपेक्षा न करता निस्वार्थी वृत्तीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत झटत असतात.
                 श्रीराम वैद्य हे गेली ४५ वर्ष सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. अनेक संघटनांवर पदाधिकारी,सदस्य म्हणून काम पाहत आहेत.त्यांना आजवर विशेष कार्यकारी अधिकारी,गणुवंत कामगार पुरस्कार, आदर्श मित्र पुरस्कार, राष्ट्रीय सामाजिक एकता गौरव पुरस्कार, मुंबई रत्न पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, कोकण दिप सामाजिक सेवा पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रयत सेवक पुरस्कार, आदर्श मुंबईकर महापौर सन्मान पत्र, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे गौरव पत्र, नशाबंदी मंडळ नागरिक समिती गौरवपत्र, रक्तदान शिबिर प्रशस्तीपत्र, कामगार सभा आकाशवाणी मुलाखत, नागरी संरक्षण दल, बृहनमुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप, स्वकुळ वैभव पुरस्कार व संकल्प कृतार्थ जीवन गौरव पुरस्कार आदी पुरस्कार मिळालेले आहेत.
                   श्री. मोहन जयराम कदम हे एक अष्टपैलू-व्यासंगी सामाजिक कार्यकर्ता आणि निस्पृह- सजग पत्रकार असे व्यक्तिमत्व आहे. त्यांना आजवर राष्ट्रीय एकता सन्मान महासोहळा,राष्ट्रीय ग्राउंड लीडरशीप आयकॉन पुरस्कार,कोकणदीप समाजरत्न पुरस्कार २०२५, एशियन टॅलेन्ट गोल्डन अवॉर्ड सोहळा. भारतरत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार,प्रेरणा फाउन्डेशन तर्फे महाराष्ट्र उत्कृष्ट समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार २०२५, प्रेरणा फाउन्डेशन तर्फे राज्यस्तरीय माणुसकी रत्न पुरस्कार २०२५, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अमरदीप फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय जनरत्न प्रतिक्षा भूषण पुरस्कार २०२४, धगधगती मुंबई पुरस्कार २०२३,कला साधना सोशल संस्था पुरुष उत्कृष्टता पुरस्कार २०२३,लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद राष्ट्रीय लोक कल्याणकारी सेवा रत्न पुरस्कार २०२३,कार्यदर्पण आणि इव्हेंट टी एम जी सहयोगी संस्थेतर्फे जनगौरव कार्य दर्पण आयकॉन पुरस्कार २०२२,आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा परिषद व महाराष्ट्र न्यूज १८ 'भारत श्री' नॅशनल पुरस्कार २०२२ आदी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.
                सामाजिक कार्यातील सर्वोच्च पुरस्कार कोकणरत्न म्हणून दीपक फणसळकर यांचा गौरव करण्यात आला. समाज तुमच्या कार्याची दखल तेव्हाच घेते जेव्हा तुमच्या सामाजिक कार्याचे दाखले नव्या तरुण पिढीसाठी दिले जातात.दीपक फणसळकर या कामासाठी अग्रेसर आहेतसामाजिक कार्यात कायम आपले योगदान देऊन समाजाला नव्या दिशेने घेऊन जाणारे ,छोट्या छोट्या कार्यांनी मोठे बदल घडून येतात तुमचं या कार्यात सातात्यते टिकणे फार महत्वाचे असते .श्री फणसळकर यांची समाजाप्रती असलेली कार्यतत्पर सेवा आणि सातत्य आणि म्हणूनच स्वतंत्र कोकणराज्य अभियाना तर्फे त्यांची "कोकणरत्न"या सर्वोच्च पदवीसाठी निवड करण्यात आली .हा पुरस्कार त्यांना मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदाना जवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे आणि वरिष्ठ पत्रकार आणि संपादक श्री सचिन कळझुनकर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फणसळकर यांना आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.पुढील सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेकांनी शुभेछया दिल्या आहेत.
                समाजात बरेच लोक सामाजिक कार्यात योगदान देत असतात हा पुरस्कार त्या सर्व समाज बांधवांचा आहे जे आपले घर संसार सांभाळून समाज कार्य करतात असा मोलाचा संदेश कार्यक्रम दरम्यान श्री दीपक फणसळकर यांनी दिला.
                   शांत्ताराम गुडेकर यांना महाराष्ट्र शासनाने "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून २०१२ ते २०१७ या काळावधीसाठी नियुक्त केले होते.त्यांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर फँलोशिप पुरस्कार -दिल्ली प्राप्त झालेला आहे.ते महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दल-एन विभाग-क्षेत्र-३ मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.शिवाय महाराष्ट्र शासन अनुदानित नशाबंदी मंडळ- महाराष्ट्र राज्य या मंडळतर्फे नशाबंदी चे काम करतात.कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई जिल्हा सचिव म्हणून ते काम पाहिले असून त्यांना नगर मित्र,आदर्श समाजसेवक ,समाजरत्न , दक्ष नागरिक ,कोकण भूषण ,वृत्तदिप पुरस्कार ,महापौर गौरवपत्र तसेच सोनी टि.व्ही वरील सी.आय.डी मालीकेला वर्धापनदिनानिमि आयोजित कार्यक्रमात शांत्ताराम गुडेकर यांना "स्थानिक हिरो" सी.आय.डी मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे.
          शांताराम गुडेकर महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग, महाराष्ट्र शासन चे सदस्य, माझी वसुंधरा, महाराष्ट्र शासन चे सदस्य आहेत. शिवाय माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना चे मुंबई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत.अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती चे मुंबई उपनगर सचिव आहेत.
           रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील कोचरी गावातील सुपुत्र कु. केतन भोज यांचा हा सातवा पुरस्कार असून ते आरटीआय कार्यकर्ता आहेत.शिवाय कोकणच्या समस्यांवर लेखन करून त्यांचा पाठपुरावा सातत्याने ते करत आहेत.महाराष्ट्र हरित सेना,वन विभाग महाराष्ट्र शासनचे ते सदस्य आहेत.कोकणातील अनेक समस्या वर्तमान पत्रात मांडून त्यांना मार्गी लावण्यात केतन भोज अग्रेसर आहेत. त्यांना मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या सहीचे सोशल मिडिया महामित्र हे सन्मानपत्रही प्राप्त झालेले आहे. शिवाय ते विविध संस्था,पत्रकार संघटना, वृत्तपत्र लेखक संघ,मंडळ यांचे पदाधिकारी असून हातात घेतलेलं प्रत्येक काम पूर्ण करण्यात ते यशस्वी झालेले आहेत.आजवर त्यांना २७ विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.
              कोकणचे सुपुत्र श्रीराम वैद्य, मोहन कदम, दीपक फणसळकर, केतन भोज, शांताराम गुडेकर "कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचे पत्रकार मित्र, विविध पत्रकार संघ, सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, राजकीय पक्ष नेते, असंख्य वाचक, चाहते, हितचिंतक यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ सुरेश पाटील यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई - भांडुप येथील शिक्षक , पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना मुंबई मराठी पत्रकार भवन येथे...